पानगळ होऊ लागली आहे. काळोखाचा रंग गडद होत चालला आहे. पिवळी धूप काळोखाच्या अदृश्य मिठीत गुडूप झाली आहे. नवजात पक्ष्यांची चिवचिवाट ढगांच्या आवाजाशी सलगी करत आहे. रस्त्यावर पावसाच्या थेंबांची गर्दी झाली आहे.
थोडी विचारांतून विश्रांती घेताना खिडकीतून हात बाहेर काढून हातांच्या बोटांशी चाळे करत मी डोळ्यांनी भरभर पाहण्यापेक्षा डोळे मिटून बंदिस्त चार भिंतीत का असेना निसर्गाचा सहवास शरिरापर्यंत सुखरूप पोहोचवत होते…
जुन्या चित्रपटांनी डोकं खिडकी बाहेर काढून जगजीत सिंग यांची होठोंसे छु लो तुम, गझल लावून हात बाहेर काढून मनातल्या सगळ्या टोकाच्या भावनांना मोकळं व्हायला शिकवलं. पण डोळ्या, नाका, मानेवरून फिरणारा गार वारा आता इतका सुखावह नव्हता. टोकाच्या भावना म्हटलं की माणूस रौद्र होऊन जातो. त्यात रमायला आवडत नसलं तरी तिथून बाहेर निघणं आपल्या माणूस असण्याला शक्य नसतं…
हे काय? मरगळ आली दोन मिनिटांत…
हिरॉईन व्हायचं का? हा प्रश्न त्या नट्यांना पाहून पडायचा, त्यांच्या पावसातल्या जगण्याकडे पाहून.
पण हिरॉईन सौंदर्यासाठी नाही, तिच्यासारखं जगता यायला हवं. क्षणभंगुर! टोकाच्या भावनांनी क्षणभंगुर असावं. चित्रपटांची मरगळ ही अस्थिर असते. माणसाला ती आवडते. अवस्ताविक असते.
त्यामुळे तो प्रश्न नसतो, जगताना मरगळ नको यायला. मातीचा सुगंध यायला हवा. तितकं स्वच्छ आयुष्य देऊनही समाजात वावरताना दूषित माणसांचा प्रवाह वाट्याला नको यावा. आला तरी तुम्ही त्याचा भाग न व्हावा, तुम्हाला पाऊस होण्याचं वरदान मिळावं. कुठलाही भेद न ठेवता जगावं स्वैर, सुखाने, स्वतंत्र पण सगळ्यांसाठी.
✍️&📸- ©Pooja Dheringe