प्रेम वाढत जातं,
तुम्ही कधीही एकाच व्यक्तीच्या प्रेमात खूपदा पडू शकतात. तिथे कसलीच लाज नसते. तुम्हाला नवं होता आलं पाहिजे. कधी नाही जमलं तर जुन्या झालेल्या त्याच प्रेमाचा पाचोळा उसना घेऊन तो कुस्करून त्याचा गुण घेता आला पाहिजे. पुन्हा त्याच शरीराशी नव्याने सलगी करता यायला पाहिजे. त्याच असंख्य नव्या येणाऱ्या फिल्म्ससारखं ज्यांची गोष्ट नवी असते, मात्र पात्र जुनीच असतात. तोच शाहरुख, तीच काजोल असते. तोच इम्रान हाश्मी तीच विद्या बालन असते. पण तुम्ही ज्या नाविन्याने थेटरात पाय ठेवतात, त्यामुळे फिल्म्स बनवल्या जातात. तुमच्यामुळे कुणाचीतरी शंभरेक वर्षांची आयुष्य चालतात. जे तुम्ही इतरांसाठी करतात, तसं स्वतःसाठी करावं लागतं. महागडं असतं, फिल्म्स सुद्धा घडवणं सोप्प काम नसतच ना… त्यात जितका पैसा खर्च होतो, तितकंच एका लेखकाचं भावनिक मन खर्ची झालेलं असतं. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याला एक सुंदर सुरुवात आणि साजेसा प्रवास देण्यासाठी काही कष्ट जाणून बुजून करावे लागतात गो!
“प्रेम झालं” एवढीच कथा नसते. प्रेमामुळे आयुष्याच्या दिशा बदलतात. त्यामुळे जोडीदाराला सहज जाऊ देऊ नका. खटके कोणात नाही उडत? कुठेतरी काहीतरी मीठ मोहरी जास्त होतेच. पण प्रयत्नच केले नाही असं व्हायला नको. कारण पुन्हा पारिजातक लावता येतोच, मोगराही लावता येतोच. फक्त रोपं टिकली नाही म्हणून हार मानू नका. एखाद्याचं बहरणं तुमच्या हातात आहे, ही किती पुण्याची गोष्ट असते. नात्यांचा सुगंध दिसत नाही, पण साथ कायम असली की त्या नात्याचा गंध नात्याला नेहमी दरवळत ठेवतो.
– पूजा ढेरिंगे
Hello mam tumhi jo mitr ani adhi bf asto tya muli cha to lekh wachla khup laglai wo manala…mazi same story ahe wo…tumhala aaikchi asel tar mi sangu ka ..