आताशा कुठे मद्यप्रेमिंचा जीव बाटलीत पडला …
कोरोनाशी संघर्ष आता अधिक धैर्यशील झाला…
मद्यप्रेमिंना आजपासून मोकळीक मिळणार… अर्थव्यवस्था मजबूत होणार…
क्या बात है…
क्यों, सारी दुनिया खुश हो गई ना…
थोडा दिलासाही मिळाला.
महामारीच्या संकटात आर्थिक महामारीला योग्य पर्याय सापडला. शिवाय राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मांडलेले विचारही तथ्यांसहित पटणारे आहेत.
त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि तोंडांची नि डोक्याची तरारी प्रफुल्लित करायला सकाळीच मद्यप्रेमी दुकानात गेले, पहिला दिवस म्हणून रांगा लावल्या, त्यांचे स्वागत झाले, मद्यविक्री करणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत राहिला, एकंदरीत सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळणाऱ्या बातम्या पसरल्या, सोशल मीडियावर दुजोरा मिळाला, मिम्सचे वारे मद्यपिंची बाजू मांडून हवा करू लागले. पण काही तथ्य पडद्याआड राहिली…
दारू विक्रीची दुकाने कायद्याने सुरू झाली याचा अर्थ या आधी हातभट्टीचे काम थांबले होते किंवा इतर प्रकारातील बेकायदेशीर दारू विकली नाही, असा आहे का? असेल तर दिवसाआड दारूचे ट्रक सापडल्याच्या बातम्या का येत होत्या? …
दारू कायदेशीर पद्धतीने बंद होती, ती सुरू करणे एका अर्थी सकारात्मक असले तरी त्याचे दुष्परिणाम न होऊ देणे मद्यपिंच्या हातात आहे.
पाश्चात्य देशांत ‘सेंसिबल ड्रिंकिंग’ ही संकल्पना प्रचलित आहे. अर्थात, घर आणि आयुष्याचा गाडा सांभाळून कोणालाही हानी होणार नाही इतके समजूतदारपणे प्या!
पण एखाद्याला पिल्याशिवाय होतच नसेल म्हणजेच तो प्रोपर व्यसनी मद्यपी असेल तर तो दुसऱ्या दिवशी पिऊन येणार. अशावेळी त्याल रांगेत दोन पायावर उभं राहता येणार का? त्या ठिकाणी थोडा धक्का लागण्याचा उशीर अरेरावी आणि शारीरिक हाणामारी होणार नाही कशावरून?
काहीजणांचा खर्च असेल स्वतःवर ताबा, तरी सोशल डिस्टंसिंग पाळले जाणार का?
दारू पिऊन घरी जाणारे किंवा घरी आणून दारू पिणारी लोकं त्यांचे फ्रस्ट्रेशन घरी काढणार नाही कशावरून?
दारू पिणे म्हणजे काहीअंशी भावनांवर, शरीरावर आणि मनावर ताबा नसणे, त्यामुळे अनेक भांडण, तंटे, वाद आणि नव्या विकृतींना आमंत्रण मिळेल. त्यामुळे क्वारंटाईनच्या काळात कुटुंबात सुख शांती कायम ठेवण्यात दारूने फूट पडणार नाही का?
तुम्हाला माहिती आहे, समाजात काहीजण कुणालाही हानी न होता, मद्य प्राशन करू शकतात. शिवाय, कमी प्रमाणात दारू पिल्यास आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम तुलनेने कमी होतो, मृत्यूची संभाव्यता कमी होते, कमी पिल्यास कामावरही लक्ष लागते, कमी पिल्यास इतर रोग उद्भवत नाही, परंतु कितीही कमी मद्यप्राशन केले तरी पिल्याने उत्पादक शक्ती कमी होते, परिसर सिल असल्यामुळे अपघात टळतात, परंतु या काळात पिऊन राजा बनल्यास पोलिस यंत्रणा आणि तुरुंगाची हवा आजही खावीच लागेल, आता सध्या घरातच असल्यामुळे तुमचं दारूचं व्यसन पाहून घरातील व्यक्तींवर आणि लहान मुलांवर चुकीचे परिणाम होतील.
काहीजण त्यांचा त्रागा काढण्यासाठी मद्याचा वापर करतात. व्यसनी मद्यपी वाढून गृहस्वास्थ्य बिघडायला नको ही अपेक्षा आहे. कारण दारू ही देशाचे आर्थिक स्वास्थ्य मजबूत करेल पण गृहस्वास्थ्य उन्मळून पडेल. रागाला जाऊन घटस्फोट, जाळपोळ, अत्याचार, डोक्यात सनक गेली तर हवं ते करणे, या अशा वृत्तींचा सामना करावा लागेल.
शिवाय तत्कालीन आनंद, पार्टी आणि ताण घालवण्यासाठी तेवढ्यापुरती पिली तर आत्मनियंत्रित दारू सगळ्यांसाठी फायदेशीर असेल.
दारुविक्रीच्या विरोधात नाही, परंतु काही प्रमाणात विक्री सुरू करावी. दुकानासमोर गर्दी टाळण्यापेक्षा आणि लोकांनी रस्त्यावर येण्यापेक्षा दारू विक्री घरपोच सेवेच्या माध्यमातून पुरवणे फायदेशीर ठरेल, असे वाटते.
मद्यप्रेमिंनो, दारू घ्यायला पैसा आपल्याच खिशातून जाणार आहे, त्यामुळे त्यातून योग्य तेवढाच फायदा घ्या. अधिक चाखायला जाल तिथे माती हाती येईल, तुमच्याही आणि सरकारच्याही!
जरूर प्या, पण सेंसिबली!