“मुलाने मुलीला पाहिलं,
मुलीने मुलाला पाहिलं,
एवढ्यात प्रेम झालं…” ही एका वाक्यात संपणारी गोष्ट नसते. एका नजरेत प्रेम घडणाऱ्या गोष्टी मला खोट्या वाटतात. काही लव्ह ॲट फर्स्ट साईट लव्हस्टोर्या फेमसही झाल्या. याचं कारण त्यांचं प्रेम तितकं सहज होतं अस नाही. तर त्या दोघांचे स्वभाव नशिबाने एकमेकांना समजून घेणारे निघाले. “स्वभाव” ही प्रेमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते.
काहींचा स्वभाव तडजोडीचा असतो. काहींना आपल्या जोडीदाराकडून असंख्य अपेक्षा असतात. अपेक्षा असल्यामुळे तडजोड होईलच असं होत नाही.
त्यामुळे एका भेटीत तो व्यक्ती, त्याचा स्वभाव, त्याच्या अपेक्षा लक्षात येत नाहीत.
त्यामुळे लव्ह मॅरेज करताना जोडीदार निवडत असाल तर नक्की याचा विचार करा. तुम्हाला लव्ह मॅरेज मध्ये स्वभाव निवडण्याचा ऑप्शन खुला असतो. प्रेमाचा रंग उडून गेला की हा स्वभाव माणसाला एकत्र बांधून ठेवत असतो. एकमेकांजवळ आणत असतो.
त्यामुळे हा लाँग टर्मसाठी विचार असावा! प्रेम तातडीने होणारी गोष्ट असते. पण ते आयुष्यभर झेपेल का ? की पुढे जाऊन आपणही त्या रडणाऱ्या नवरा बायकोंसारखं दुःख करत बसणार आहोत ? आज जसं सगळं सुंदर वाटतंय ते तसचं सुंदर ठेवण्याची ताकद आपल्या दोघांच्यात आहे का? याचा आधीच विचार करायला हवा.
मुलांनी त्यांच्या अपेक्षांचा बेसिक विचार करून मुलगी पहावी… उगाच अव्वाच्या सव्वा अपेक्षा आणि मुलगी वेगळ्या विचारांची असेल तर तुमच्या दोघांसाठी पुढे जाऊन सगळचं अवघड होईल.
मुलीने मुलगा निवडताना किमान त्याच्या नोकरीचा विचार करून त्याची निवड करावी. कारण घरजावई होणार नसेल तर आपण दुसऱ्याच्या घरी जात असतो. आताच्या काळात नोकरी मिळणं कठीण असतं. जर मुलगीही नोकरी करत नसेल आणि मुलगाही त्यासाठी सक्षम नसेल तर त्या दोघांचं आयुष्य असच तिसऱ्या कुणाच्या आधारावर पुढे जात राहील. त्याला काहीच अर्थ नसतो.
बऱ्याचदा ऐकतो आपण, खायला प्रेम पुरत नाही. ते प्रेमाच्या दोन चार वर्षात तुमच्या लक्षात येऊ लागतं. त्यामुळे मूलभूत गरजा भागायला एकमेकांची साथ आणि सोबतीने होणारी वाढ महत्त्वाची असते. दोघांनी मिळून मिसळून जेवढं कराल तेवढंच मानसिक, शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकून राहतं. जे आयुष्यभर पुरतं.
त्यामुळे आयुष्याचा प्रवास सोपा करण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने थोडा विचार करा. भावनेच्या भरात क्षणिक निर्णय घेऊन आयुष्याला चुकीच्या वळणावर लावू नका.
– पूजा ढेरिंगे