प्रसंग वेगळा आहे.
माझं डोकं चालत नाही इतका वेगळा आहे.
प्रसंगात स्पर्श आहे..पण स्पर्शाला वास आहे घाणेरडा. त्यात वात्सल्य नाही, अहंकार आहे.
खूप चीड आहे.
जो स्पर्श करतो त्याला वाटणारी चीड.
ती चीड कुणा पुरुषावर नाही, ती स्त्रीवरची चीड आहे.
कारण पुरुषावर असलेल्या संतापाला शिव्या आणि हाणामारीचे वरदान आहे पण स्त्रीला बलात्काराचा शाप आहे…!
चीड आहे की अहंकार आहे ?
काहीतरी खुपलय की त्याच्या अहंपणाला ठेच पोहोचलीय? …
उत्तर काय आहे?
जर कापड नावाची गोष्टच जगात नसती तर? …
हा घोळ कापडाने होतो की कापडाने झाकला जातो?…
पृथ्वी तळावर माणसाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा तो नग्नच जन्मला, हो ना?. त्यानंतर स्त्री पुरुष एकमेकांना लिंग – योनी या दोन्ही अवयवांमुळे वेगळे दिसू लागले. मग जे वेगळं ते झाकायच आणि जे झाकलं त्याचा अव्वाच्या सव्वा बाऊ करायचा. त्यातूनच अन्न, निवाऱ्यात वस्त्राची भर पडली.
पण स्त्रीकडे इतकं काय वेगळं की त्याकडे आकर्षित व्हावं? कारण ज्याप्रमाणे स्त्रीला योनी तसं पुरुषाला लिंग याव्यतिरिक्त स्तन आणि योनीला इतकं संभोगाचं साधन का बनवावं.?
असेलही आकर्षित! कारण पुरुषाची रचना ही सरळ आणि स्त्रीची सुडौल आठ (8) या अंकासारखी असते. पण वासना पूर्ण करण्यासाठी तिचा वापर… खूप जास्त शारीरिक विचार केला तर तेही मान्य !
म्हणून त्याकरिता पुरुषांसाठी वेश्या, एस्कॉर्ट. स्त्रियांसाठी प्ले बॉय वगैरे. फेअर इनफ?
पण बलात्कार?
ही आणि कोणती वृत्ती…?
बलात्कार होण्याची कारणे बरीच अहंकारी आहे…
एखाद्या बाईने तुम्हाला कमी लेखले म्हणून हे बलात्कार होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. शिवाय लहान मुलींच्या हालचालीमुळे स्फुल्लिंग उत्तेजीत होणे, छोट्या कपड्यात दिसणाऱ्या मुलीचे काल्पनिक स्वप्न पाहून एखाद्या मोक्याच्या वेळी तिच्यावर अती प्रसंग करणे, खुन्नस काढणे, सार्वजनिक ठिकाणी अपमानित झाले असेल तर सूड उगवणे, सतत बाईच्या स्तन आणि योनीला न्याहाळत कल्पनेत जगणे, पूर्ववत चालत आलेल्या स्त्री उपभोगाची वस्तू या पूर्वग्रहाने कृत्य करणे, सिनेमातील दृश्य प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी, एकट्या मुलीला पाहून रात्रीच्या अंधारात समाजाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी.
अजुन कोणते नि किती प्रकार?
त्यामुळे कदाचित गरज आणि गरजेपेक्षा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे कपडा झाला आहे. असे कपडेच तयार व्हावे ज्यामुळे बलात्कार करणं अशक्यच असेल.
बळजबरी किंवा अतिप्रसंग बंद होतील. काही काळापूर्वी रेप पासून वाचण्यासाठी अँटी रेप क्लॉथ हा प्रकार बाजारात आणला गेला होता.
पण असे कपडे घालताना अन्कंफटेबल आणि विशिष्ट चैनने लॉक केलेले असतात. आणि याव्यतिरिक्त विचार केला तर सतत हे असेच अन्कंफटेबल कपडे घालायचे का?…
त्याचबरोबर अँटी रेप पँटी बनवण्यात आल्या होत्या. पण त्या ऑनलाईन बाजारापुरत्याच मर्यादित राहिल्या. त्याबाबत जागृतीबरोबरच प्रमोशन कमी पडले. परंतु पुन्हा तीच समस्या, अन्कंफटेबल फिलिंग …
का बलात्काराला इतकं घाबरलं जातं.?
कारण ज्याप्रमाणे लिंगाच्यावरील भाग नाजूक आणि सुई टोचली तरी कंठापर्यंत प्राण जाईल एवढ्या वेदना होतात ना, त्याच वेदना जेव्हा योनिसारखा संवेदनशील आणि नाजूक भाग कोणीतरी बळजबरी करून उपभोगत असल्यावर होतात. तो स्पर्श आणि त्याची कल्पनाच इतकी घाणेरड्या पातळीची असते की तिथेच त्याचं लिंग तोडून फेकून द्यावं वाटतं. आपल्या मनोइच्छेविरुद्ध आपली एखादी गोष्ट कोणी हिस्कावली तरी राग येणारे आपण, जेव्हा आपलं शरिरच कोणीतरी हिसकावत असतं. तेही आपली चूक नसताना.( चूक असो, नसो पण शरीर ही इतकी वैयक्तिक बाब आहे की तितके नैतिक मूल्य प्रत्येकाचे शाबूत असावे) कसं वाटत असेल अशा स्त्रीला? (अशावेळी निर्भया प्रकरणामधील आरोपी म्हणतो, ती ओरडली नसती तर कदाचित मेली नसती) अशा बाईला जिथे तिने आवाज काढायचा उशीर तिच्या आवाजाला योनीचा शापच असतो की काय?
तेव्हा हळूच माझ्या मनात येतं जेव्हा मी बातम्यांमध्ये आता अगदी जाता येता दिवसात एखादी बातमी बलात्काराची ऐकते, वाचते. वाटतं याबदल्यात स्त्रिया बलात्कार करू शकतात ? केला तर काय होईल.? केव्हापासून ही वृत्ती जन्मली असेल? अहंकाराची जागा म्हणजे बलात्कार का?
योनी आणि लिंग यात काय फरक आहे? – स्त्री पुरुष एवढाच… की पुरुषिपणा आणि बलात्काराएवढा?
कुणाच्या आयुष्यांना पूर्णविराम ?
नर्स अरुण शानबाग, वकिलीचे शिक्षण घेणारी प्रियदर्शनी मट्टू बलात्कार आणि खून, अंजना मिश्रा बलात्कार, बालविवाहाला विरोध केल्यामुळे झालेला भांवारी देवीवरील उच्चभ्रू जातीतील पाच पुरुषांनी केलेला बलात्कार, विदेशी पर्यटक स्कार्लेट किलिंग बलात्कार, स्वतःच्या सासर्यांनीच २०१५ला सुनेवर बलात्कार केला ती इमराना रेप केस…



मुंबई येथील शक्ती मिल्स गॅंग रेप केस, २०१३ मध्ये २२ वर्षाच्या छायाचित्रपत्रकारावर ड्युटीनंतर असाइनमेंटसाठी गेले असताना पाच माणसांनी तिच्या सहकार्याला टांगून ठेऊन तिच्या गेल्यावर बिअर बॉटल ठेऊन तिच्यावर एकामागून एक बलात्कार केले. ते समाधानी झाले, हसले खिदळले आणि स्वतःच्या लिंगाला शांत करून एका मुलीच्या आयुष्याला गलिच्छ केलं…

त्यांनतर दिल्लीमधील निर्भया, म्हणजे २३ वर्षाच्या ज्योती सिंग पांडे हिच्यावर सहा जणांनी बलात्कार केला. करणं होतं रात्री उशिरा घरी परतताना तिने आणि तिच्या मित्राने बसने प्रवास केला, आणि एका छोट्याशा वादाच्या निमित्ताने पुरुषाचा अहंकार दुखावला आणि त्याने तिच्या योनीचा तिरस्कार करत तिला ओरबाडून खाल्लं… का?

उन्नाव रेप केसमधील बलात्कारी आमदार सेंगरची घटना आठवलीच असेल? त्या हरामखोराला जाब कुणी विचारायचा ? मग येते आदिवासी मुलगी, मथुरा गॅंग रेप केस म्हणून. या मुलींना तर जणू समाजाने गृहीत धरून विकतच घेतलेलं असतं. घटना १९७२ ला समोर येते कारण आश्रमात राहणाऱ्या या आदिवासी मुलीवर अशोक नावाचा मुलगा प्रेम करू लागतो. पण आदिवासी मुलीच्या घरी असलेले दोन भाऊ अशोक आणि मुलीच्या लग्नाला विरोध करतात. ते भाऊ अशोकची तक्रार करतात. त्यांनतर पोलीस चौकीला दोन्ही भावांची वाट पाहत थांबलेल्या त्या मथुरावर हे पिसाळलेले दोन पोलीस बलात्कार करतात. सांगा मग कोणाकडे न्याय मागायचा ? सगळेच एकजात चड्डीत गांडूळ वळवळल्यासारखे वागतात, फोडून टाकावा यांच्या नजरांना आणि शापित मानसिकतेला….

एनसीआरबी २०१५ च्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. राजस्थानमध्ये जोधपूरमध्ये हा दर सर्वात जास्त आहे. त्यानंतर दिल्ली.
संविधान काय म्हणते?
भारतीय दंड संहिता कलम ३७५, एखाद्या पुरुषाने “बलात्कार” केला असे तेव्हा म्हटले जाते;
जर, एखाद्या पुरुषाने त्याचे लिंग तिच्या योनीत, तोंडात, मूत्रमार्गामध्ये किंवा ऍनस या भागांमध्ये टाकले किंवा तिला टाकण्यास भाग पाडले किंवा शरीराच्या कुठल्याही भागाला बळजबरी हाताळण्याचा प्रयत्न करणे किंवा पुरुषाने त्याचे तोंड एखाद्या स्त्रीच्या योनी, ऍनस, मूत्रमार्गाजवळ नेणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस असे करण्यास प्रवृत्त करणे;
खालील सात वर्णनांपैकी कोणत्याही परिस्थितीत तिला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर तिला असे करण्यास प्रवृत्त करणे म्हणजे तो बलात्कार ठरतो.
पहिले म्हणजे : तिच्या इच्छेविरुद्ध.
दुसरे म्हणजे : तिच्या संमतीशिवाय.
तिसरे म्हणजे : तिच्या संमतीने, जेव्हा तिच्या जवळच्या किंवा आवडीच्या व्यक्तीच्या मृत्यूची किंवा दुःखाची भीती दाखवून संमती प्राप्त केली जाते.
चौथे म्हणजे : तिच्या संमतीने, जेव्हा त्या पुरुषालामाहिती असते की तो तिचा नवरा नाही तरीही तिची संमती दिली जाते कारण तिला असा विश्वास असतो की हा माणूस तिचा पती आहे किंवा ती त्या पुरुषाशी स्वत: कायद्याने विवाहित असल्याचे मानत असते.
पाचवे म्हणजे : तिच्या संमतीने, जेव्हा बेसावध मन किंवा नशा किंवा वैयक्तिकरित्या किंवा कोणत्याही फसवणूकीचे किंवा अपायकारक पदार्थांद्वारे तिची संमती घेतली जाते तेव्हा ज्याला संमती देताना ती बलात्काराचे स्वरुप आणि त्याचे परिणाम समजून घेण्यास असमर्थ असते.
सहावा म्हणजे तिचे वय अठरा वर्षाखालील असेल तेव्हा, तिच्या संमतीसह किंवा संमतीशिवाय.
सातवा म्हणजे जेव्हा ती संमती देण्यास असमर्थ असते.
सरकार :
लैंगिक गुन्हेगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस (एनडीएसओ):
२० सप्टेंबर २०१८ रोजी सरकारने लैंगिक गुन्हेगारांवर एनडीएसओ सुरू केला. डेटाबेसमध्ये बलात्कार, सामूहिक बलात्कार, पॉस्को आणि इव्ह टीजिंग या आरोपाखाली दोषी ठरलेल्या गुन्हेगारांच्या नोंदी आहेत. पोर्टलमध्ये २००८ पासून आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या केसेसची संख्या ४४०,००० एवढी आहे. हे पोर्टल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोद्वारे चालविले जाते. हा डेटाबेस केवळ कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांकरीत तपासणी आणि देखरेखीच्या हेतूने उघडण्यात आला आहे.
फास्ट ट्रॅक कोर्ट्स
२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर बलात्कार खटल्यांचा वेगवान खटला चालवण्यासाठी भारत सरकारने वेगवान न्यायालयीन यंत्रणा ( फास्ट ट्रॅक कोर्ट्स) लागू केली.
डेटा आणि बलात्कार होणाऱ्या आकड्यांवरून भारतात ‘बलात्कार हा चौथा सर्वसामान्य गुन्हा आहे. भारतात बलात्काराचे गुन्हे आणि घटना प्रकाशित करण्यावर बंदी आहे. परंतु रेप न करण्यासाठी इतके कठोर होतो का आपण?

फक्त शरीराची हवस असणाऱ्या पुरुषा, एकदा तिच्याजागी राहून फिलिंग अनुभवून बघ कल्पनेत.
खूप महत्त्वाचा लेख आहे. Rape हा खुनाइतका वाईट आहे हे जोवर प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जात नाही तोवर त्याचं प्रमाण कमी होणं अवघड आहे. आणि जर तो तसा बिंबवायचा असेल तर त्याला शिक्षा ही सेम च हवी, रेप झालेल्या मुलीला समाजाने स्वीकारलं पाहिजे ती रेप होण्याआधी जितकी समाजाची होती तितकीच किंबहुना त्याहून अधिक. म्हणजे कुणाचा रेप झालेला आहे आपल्या आजूबाजूला, आपल्या community मध्ये कुणालाही कळालं तरी चालेल आणि उलट समाजाने जसं एखाद्या आजारी किंवा वृद्ध व्यक्तीकडे सहानुभूतीने बघितलं जातं तसं बघायला हवं. याची सुरुवात घरापासून व्हायला हवी. सासर, माहेर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवेत. म्हणजे कायद्याच्या पातळीवर आणि सामाजिक पातळीवर दोन्ही ठिकाणी एकाच वेळेला बदल होणं आवश्यक आहे.