आयुष्य अंगवळणी पडत जातं. आपली रिहर्सल पक्की होऊ लागते. तेव्हा आयुष्यात रस राहतं नाही. मग नवीन वस्तू घेतल्या की आपण त्यात आनंदाची झलक शोधू लागतो, प्रयत्न असफल होत राहतात.
त्यामुळे गोष्टींत मन रमवण्यापेक्षा आपला स्वभावच आपल्याला सुखी करू शकतो. आपल्या आयुष्याला सोपं करायचं असेल ना जगण्यात सहजता आणायला हवी… ही सहजता पहिल्यांदा करताना त्यात वेगळेपण वाटणार नाही. पण ही सहजता आयुष्याचा प्रवास शांततेत व्हायला मदत करते कारण आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण आपलं आयुष्य आपल्या स्वभाव आणि तत्वांवर सोडून देतो… त्यामुळे आपला बेसच इतका सोप्पा पण आयुष्यभराचा प्रवास सुखद करण्याची क्षमता ठेवणारा हवा की आयुष्यात थकवा आला म्हणून आपण थांबलो आणि त्या थांबण्यातच हरण्याची भावना येऊ लागली तरीही कधी चुकीच्या मार्गावर जाणार नाही याची शाश्वती असेल.
आपण खूप लोकांना भेटतो. या जगात असंख्य लोकसंख्या आहे. प्रत्येक माणूस वेगळा वाटतो. आपण सहजच हां एकदम सहज म्हणजेच अंगवळणी पडल्यासारखं जज करून टाकतो. त्या व्यक्ती बद्दल मत बनवून टाकतो. पण या भेटी गाठींमध्ये काही भेटी इतक्या सुखद असतात ज्यांच्या गाठीत सहजता असते, जी सुटणारी असते पण त्या व्यक्तींनी ऑलरेडी मनात मुक्काम ठोकलेला असतो.
असं का होतं? आपण मोजक्याच व्यक्तींशी कसे जोडले जातो? कारण त्यांची नैसर्गिक लकब. त्यांचं अस्तित्व. अस्तित्व तयार होण्यासाठी आपल्या अंगी ती सहजता आणावी. अशी सहजता जी दुःखाच्या प्रसंगी दुःख व्यक्त केलं आणि सुखाच्या क्षणी खळखळून वाहेल… काही लोक काम असलं तरच गोड बोलतात, काही लोक काम आहे ते स्पष्ट बोलून टाकतात म्हणजे खरा वेळ संवादासाठी मिळतो. आपण कामाला आयुष्य बनवूया टाकतो, आणि हे आयुष्य जगावं म्हणून माणसांचा वापर करू लागतो. कामाच्या गोष्टी संपल्या की आपल्याला स्वतःला वाटता यायला हवं. हे जिथे होतं तिथे ही सहजता नांदते.
तसं पाहिलं तर जसजसं माणूस मोठा होतो, तसतसं पाय आखडून बसायला लागतो. आयुष्याला आवरतं घेतो. कशात जास्त रमत नाही. मान्य आहे प्रकृतीचा नियमच आहे तो… शरीर थकतंच, पण मनाचं वय आपल्या हातात असतं. त्यामुळेच काही माणसं स्वतःच्या आयुष्याला देखणे नियम लावतात आयुष्याला वळण लावतात, त्यातून ते खुश दिसतात. मग प्रकृती सुद्धा त्यांच्याशी जुळवून घेऊ लागते.