दोन फोटोंतला फरक ओळखा असा प्रश्न पडला तर उत्तर खूप सोप्पं आहे, एका फोटोत आम्ही खूप हसतोय, एकात गंभीरपणे विचारात बसलो आहोत.

एक फोटो मला माझ्या प्रेमाकडून खूप ताकद देतो. हा फोटो माझ्या खूप जवळचा आहे. हा फोटो आहे हिमालयातील २८७५ altitude असलेल्या त्रीऊंड ट्रेकच्या वेळीचा. या दरम्यान प्रवीण आजारी होता तरी त्याने ज्या जिद्दीने हा ट्रेक पूर्ण केला ती जिद्द मला त्याच्यापेक्षा जास्त खूप काही शिकवून गेली.
जी गोष्ट आपल्याला आवडते, ती आपण कित्ती जीव ओतून करायला हवी हे त्याने मला शिकवलं.
जोडीदाराकडून आपण रोज काहीतरी शिकत असतो.
आमचा प्रवास जेवढा हसत खेळत सुरू आहे, तितकाच तो एकमेकांना व्यक्ती म्हणून वृद्धिंगत करत आहे. आमच्यात असलेलं वयातील अंतर आम्हाला दोघांकडून नवीन काहीतरी देत आहे.
मी त्याच्याकडून स्ट्रेस फ्री राहणं शिकत असेल तर तो माझ्याकडून दुसरं काहीतरी शिकत असतो.
प्रेम आपल्याला काय देतं? यापेक्षा आपण जोडपे म्हणून प्रेमासाठी काय करतो हे महत्त्वाचं! प्रेमात आपली स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढ झाली पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी दोघांनी इक्वल प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर प्रेम करून तुम्ही फक्त इतर लोकांसारखे प्रेम करण्याची स्पर्धा करत असाल, भांडत असाल किंवा मामुली आयुष्य जगत असाल तर अर्थ नाही. अशावेळी मला पटतं की प्रेमात खूप ताकद आहे. ज्यावेळी प्रेम होतं तेव्हा आपली ताकद दुप्पट होते. त्यातून खूप काही शक्य आहे. फक्त ती ताकद कोणत्या योग्य ठिकाणी लावायची ते मिळून ठरवून गोष्टी करायच्या.
लोक म्हणतात नवीन नवीन आहे म्हणून प्रेम आहे. ठीके मला तेही मान्य! पण आपल्या हातात असतं ना प्रेम करणं? आपण प्रेम करत राहायचं, प्रेम करायला शिकवायचे आणि तसं स्पष्ट सांगत राहायचं.
याबाबतीत अनेक कपल्स आमच्या दोघांसारखे असतील. मला प्रेम डिस्कस करायला आवडतं तर त्याला डायरेक्ट प्रेमात गोष्टी करून दाखवायला आवडतात. पण असे काही प्रसंग येतात जेव्हा मला जसं प्रेम हवं तसं मी मागून घेते. याचाच अर्थ प्रेमात एखादी गोष्ट करायची असेल, प्रेम व्यक्त करायचं असेल तर मी त्याला स्पष्ट सांगते. बऱ्याच मुलींची अपेक्षा असते त्याने प्रेम समजून स्वतःहून व्यक्त व्हावं. पण मुलांच्या बाबतीत प्रेमाचा संबंध कदाचित केवळ तरुण वयात येतो.
मुलींना मात्र लहानपणापासून थोड काळजी आणि प्रेमाने वाढवलं जातं. याचा नकळत मोठं झाल्यावर प्रेम व्यक्त करताना परिणाम होतो. म्हणून प्रेम झाल्यानंतर मुली प्रेमाबद्दल जास्त ओपन होतात, मुले बुजरी राहतात. त्यामुळे काही सवयी प्रेम केल्यावर आपण लावायच्या.
तो व्यक्ती आपल्याला हवा आहे म्हटल्यावर प्रेमही वाढवायला पाहिजे.
प्रेमात समंजसपणा आला की माणूस मामुली राहत नाही,
एकमेकांच्या आयुष्याला नवं जग सापडतं.
दोघांच सुखाचं आभाळ गवसतं
आणि स्वप्नांना दुप्पट बळ येतं.
याच प्रेमाची ताकद तुम्ही भांडणात घालवत असाल तर,
उलट होतं,
दोघांचे आयुष्य वाळवंट बनतात,
आयुष्य कटकट वाटू लागतं,
सुखाला तुमच्यापासून तुम्हीच दूर लोटतात!
- पूजा ढेरिंगे
(Some photos are not perfect, they’re unbelievably memorable 😉)