पत्र संवाद जसा काळाच्या मागे गेला…
सराईत शापितासारखे ‘शब्दही’ दगडासारखे बेसुमार दिसू लागले…
मज भीती आज ही इतकीच वाटली,
पत्रव्यवहाराच्या त्या काळात मज आभासी लेखिका म्हणवलं तरी गेलं असतं ?
डिजिटल हे जग झाले,
शब्द सुमार वाढतच गेले…
शब्द स्वस्त झाली,
त्यास किंमत न उरता,
त्याचीच किंमत केली …
वो भी दिन थे,
लोग गुलजार पढ़ने के लिए छह माह इंतजार करते थे।
आज तिस किमया म्हणवत,
एका श्वासात गुगल भाऊ गुलजारांना न वाचता समोर आणून ठेवतो.
म्हणूनच
ना पत्र , ना तार, ना शब्दांस वजन राहिले…
वाहून गेल्या लाखोल्या शब्दांच्या ,
कमेंट लाईक शेअरच्या दिखाऊ आभासात…
आजही ते दिवस किती ओले वाटतात…
एssक सुंsssदरंस खुराडे, वर वाळक्या झाडांचं छप्पर, बाहेर गोठ्यात नवं कुटुंब नि त्या गोठ्यातील सुवासाचा घरभर सुवास … नि या सगळ्याला बांधून ठेवणारं एक काssटेरी कुंपण.
काटे सजावटीला वापरावे असे ते साधे दिवस होते.
एक अशीच सायंकाळ यावी, पाखरांच्या थव्यासवे जोडीला तार पत्राची धाडावी.
पत्राची गुंडाळी ती सोडत वरूनच त्या ‘ पत्रास कारण की…’ चे हजारो अर्थ चाळावे.
अंधार हा दाटून यावा, अंधारास विझवत तोरण ते कंदिलांच यावं… त्या उजेडास तव साक्षी मानत, डोळ्यांत अंदाजाचा कस लावत एखादा अंदाज निपाजत जावा नि पत्र लिहिण्यास कारण की… क्षण सुटत न्यावा….
पेटल्या चुलीतील विस्तवाची ती खरी परीक्षा व्हायची…
‘पत्रास कारण…’ आनंदाचे निघाले तव विस्तवासही दिवे लागायचे. एका कागदाची किमया ती ही अशीच बहरत कित्येक मनी सौख्य भरायची…
पण,
पण….
जर कारणास पत्र ठरले, तर तोच विस्तव राख नि धगधगता निखारा दिसायचा.
‘ पत्रास कारण की… ‘ तेवढाच एक क्षण हा दूर गावाच्या पल्याडहून मिळालेलं एक सरप्राइज ठरायचा.
ज्याच्या ‘अचानक’ एका सेकंदात आयुष्याचा मायना बदललेला असायचा.
आज वाटते, एका कागदाची किंमत त्या म्हाताऱ्याला विचारावी,
प्रेमाची किंमत त्या गावठी संसारी गृहिणीला विचारावी
नि
एका ‘शब्दाची’ किंमत या अशा लेखकासच विचारावी.
-पूजा ढेरिंगे